Monday, 9 September 2019

वृद्धाश्रमाची वाट - Path of old age home


तिच्या अनेक युक्त्या क्लुप्त्या फळाला आल्या आणि तिनं अखेर सासऱ्याला आठवड्याभरा पुर्वी वृद्धाश्रमाची पायरी चढायला मजबूर केलं,नवऱ्याला तिच्या पुढे हार पत्करून,त्या मनसुब्याला हिरवा कंदील दाखवावाच लागला,आज ती तिला हवी असलेली प्रायव्हसी,फ्रीडम उपभोगित खिडकीतून बाहेर कोसळणारा पाऊस पाहतं कॉफीचे घोट घेतं घेतं मोबाईलवर सर्फिंग करीत आरामात बसली होती,नवरा कामावर,मुलगा शाळेत,तिला डिस्टर्ब करणारं कोणीच नव्हतं...
तोच मोबाईल रिंगने तिची तंद्री भंग पावली,सासऱ्याचा कुणीतरी कनवाळू उपदेशाचे डोस पाजणार,या विचारात तिनं त्रासिकपणे मोबाईल कानाला लावला,'हॅलो मॅम मी तुमच्या मुलाच्या स्कूलमधुन बोलतोय,सकाळपासुन तुफान कोसळणाऱ्या पावसामुळे,शहरात पाणी भरायला सुरुवात झालीय,त्यामुळे स्कूलला सुट्टी देण्यात आलीय, तुम्ही तुमच्या मुलाला लवकरात लवकर घेऊन जाण्याची व्यवस्था करावी'....
तिनं मोबाईल ठेवला,प्रथमच ती लक्षपूर्वक बाहेर पाहतं होती,खरंच चवताळून पावसाच्या धारा खाली येतं होत्या,सकाळी नवरा नको नको म्हणत असताना तिनं हट्टाने मुलाला त्याच्या सोबत बाईकवर पाठवलं
होतं,स्कुटीवर शाळेतून आणायची जबाबदारी तिनं स्विकारली होती,मुलाचे आजोबा घरांत होते,तोवर ते आनंदाने नातवाला स्कूलला सोडायचे,घेवुन यायचे,पण त्यांना दुचाकी नीट चालवता येतं नाही या सबबी खाली,तिच्या कडुन मनाई केली गेली होती,आजतरं सासरे सुध्दा नव्हते..भर पावसात कसंही,कांहींही करून तिला स्कूल पर्यंत जाणं भाग होतं ......
घर बंद करून,स्कुटीची चावी घेवुन ती तड्क खाली पार्किंगमधे आली,आणि तिचे डोळे विस्फारले, 'अरे ! देवा हे कांय'? रस्त्यावर वाहणारं पावसाचं पाणी सोसायटीत घुसलं होतं आणि तिच्या दुचाकीसह पार्किंगमधल्या ईतर गाड्या अर्ध्या अधिक पाण्यात विसावल्या होत्या,तिच्या काळजात धस्स झाले,इथे अशी परिस्थिती तरं बाहेर कशी असेल? तिला रडू कोसळलं,तीन घाईघाईने नवऱ्याला मोबाईलवर सारं सांगितलं,रस्ते पाण्याखाली गेल्यानं तो सुध्दा कांहीच करू शकतं नव्हता,तिच्याशी बोलताना,
'आज तुझ्या सोबत बाबा असते तरं ? हे शब्द मात्र तिच्या जिव्हारी लागले होते.....
आता जे कांही करायचं होतं ते तिला एकटीला,पावसाची संततधार अजुनही सुरू होती,कुणीतरी घ्यायला येईल याकडे डोळे लावुन बसलेल्या मुलाचा रडवेला चेहेरा तिच्या डोळ्या समोर आला,आणि तिनं मनाची तयारी करून सोसायटी गेट कडे जाण्यासाठी गुडघाभर पाण्यात पाऊल टाकलच होता,तोच 'मम्मी' हाक ऐकू आली तिनं चमकून आवाजाच्या दिशेनं अधिर होऊन
पाहिलं,जवळजवळ कमरे ईतक्या पाण्यातून वाट काढीत चिंब भिजलेले,तिच्या लाडक्या कोकराचे आजोबा आपल्या नातवाला खांद्यावर बसवून घेऊन येतं होते.....
दोघं जवळ येताक्षणी तिनं मुलाला आवेगाने कवेत घेतलं, 'सुनबाई ! सांभाळ माझ्या नातवाला ! स्कूल पेरेंट व्हाट्सअप ग्रुपमुळं मला सारं समजलं,मी आधिच तिथं जावुन बसलो शाळेत,तुला वेळ नसेल मिळाला पहायला,चल ! निघतो मी,काळजी घे लेकराची,
आणि एक गोष्ट लक्षांत ठेव पोरी! घरातली अडगळ समजुन तु जरी मला बाहेर फेकलं तरी वर्षभर घरांत अडगळीत पडलेली काठी,गुढीपाडव्याला गुढी उभारायला नक्कीच उपयोगी येते'....झाल्या प्रकाराने मनोमनी खजील झालेली ती,पाण्यातून तोल सावरत सोसायटी गेटकडे निघालेली,तिच्या सासऱ्याची पाठमोरी आकृती हतबल हतबुद्ध होऊन पाहात होती,पण क्षणभरच, 'बाबा मागे फिरा ! चुकले मी' ! तिचे भावुक स्वर,अश्रूधार आणि पाऊसधार यांत एकरूप होवुन तिच्या गालावरून ओघळत होते

Wednesday, 4 September 2019

बिलीफ सिस्टीम - Belief System - Marathi Article


लोक विचारतात, “एकाच वेळी, आनंदी आणि यशस्वी होता येतं का?”
माझं उत्तर असतं, “आनंदी लोकंच यशस्वी होतात, आणि यशस्वी लोकं तर नेहमीच आनंदी असतात.”
मग प्रश्ण पडतो, जगामध्ये आनंदी आणि यशस्वी लोकं इतके कमी का आहेत? त्यांना काय वरुन येताना देवाने काही वेगळी प्रॉग्रॅमींग करुन पाठवलेले असते का?
शुन्यातुन साम्राज्य निर्माण करणार्‍या लोकांच्या मेंदुत एखादी स्पेशल चीप बसवलेली असते का? जी त्यांना एक्स्ट्रा ऑर्डीनरी बनवते?
धीरुभाई अंबानी म्हणलं की काय आठवतं! – पैसा, प्रगती, झपाटलेपणा, संपत्ती!
तेच जे आर डी टाटा म्हण्टलं की – पैशासोबतच सचोटी, दानशुरपणा आणि मुल्यांची जपणुक!
स्टीव्ह जॉब्ज म्हणजे – गॅझेटच्या जगातली क्रांती!
तेंडूलकर किंवा अमिताभ म्हणजे शिस्त, प्रचंड आणि कठोर परिश्रम!
जगाला प्रदुषणमुक्त करण्याचं स्वप्न बघणारा निकोल टेस्ला माहितीये?
जगप्रसिद्ध व्हर्जिन ग्रुपचा मालक ‘रिचर्ड ब्रॅन्सन’? बारा बारा उद्योगामध्ये एक नंबरवर असलेला हा माणुस तुम्हाला नेहमी समुद्रकिनार्‍यावर मजा करताना दिसेल!
ह्या लोकांनी जगाला प्रभावित केलं ह्याचं कारण काय?
ह्या लोकांपेक्षा असं काय वेगळं होतं, जे इतर लोकांकडे नव्हतं!
बिलीफ सिस्टीम!
तुम्हाला त्या पायाला दोरखंड बांधलेल्या हत्तीची गोष्ट माहितीये? त्याच्या मनावर लहानपणापासुन बिंबवलेलं असतं, की तो दोरखंड तोडू शकत नाही, आणि हा जगातला सर्वात शक्तिशाली प्राणी शेळी बनुन जगतो, केवळ त्याच्या बिलीफ सिस्टिम मुळे!
आपल्या आयुष्यात आलेली संकटं, अपयशं आपल्याला असं भासवतात, की आपण दुर्बळ आहोत, पण आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्तीचा प्रचंड साठा आपल्या मनात आणि शरीरात दडलेला असतो.
बिलीफ सिस्टीमचं एक उदाहरण देतो,
समजा, तुम्ही तुमच्या नातेवाईकाच्या घरी एका कार्यक्रमात गेला आहेत, जेवणे चालु आहेत, वाढण्यात तुम्हीही त्या परिवाराला मदत करत आहात, कोणीतरी सांगतं,
“जा बरं, किचनमधुन तेवढं मीठ घेऊन ये!”
तुम्ही किचन मध्ये जाता, पण मनात विचार येतो, “इथे मी नवीन आहे, मला यांच्या घरातलं मीठाचं भांडं कसं सापडेल, बरं?”
अस्ताव्यस्त किचनमध्ये आपल्याला ते मीठाचं भांडं दिसतच नाही,
आपण रिकाम्या हाताने वापस आलेलं पाहुन ती व्यक्ती म्हणते, “अरे समोरचं तर ठेवलेलं आहे,”
आणि आपल्या हाताला धरुन ती किचन मध्ये येऊन भांडं दाखवते, आणि मीठाचं भांडं एकदम समोरच असतं,”
आपल्याला ते आधी सापडत नाही कारण आपण स्वतःला ऑर्डर दिलेली असते, की “मला ते सापडणार नाही, आणि आपलं अंतर्मन अगदी तसचं घडवतं.”
बिलीफ सिस्टीम माणसाला यशाच्या शिखरावर पोहचवतो किंवा त्याची धुळधाण करतो,
चांगली बिलीफ सिस्टीम म्हणजे, ‘माझ्याकडे काय नाही’, हे न पाहता, ‘माझ्याकडे काय काय आहे?’ याचा विचार करणं!
रजनीकांत कंडक्टर होता, त्याच्याकडे हिरोसाठी लागणारा गोरागोमटा, लोभस चेहरा नव्हता, पण त्याच्याकडे स्टाईल आणि डायलॉग डिलीव्हरी होती, त्याने त्याच्यावर फोकस केला,
आज तो जगातला असा एकमेव अभिनेता आहे, ज्याचे पिक्चर जपानमध्येही हाऊसफुल होतात.
अमिताभला सांगण्यात आलं होतं, तुझी उंची तुझा हिरो बनण्यातला अडसर आहे,
अनेक रिजेक्शन नंतरही अमिताभ निराश झाला नाही, त्याने स्वतःला विचारलं, माझ्याकडे काय चांगलं आहे?
त्याने असा काही आवाज कमवला, दोन मिनीटांच्या निवेदनासाठी आज त्याला करोडो रुपये ऑफर होतात.
जेफ बेजोस असो वा जेक मा,
स्टीव्ह जॉब्ज असो वा बिल गेटस,
नारायण मुर्ती असो वा नरेंद्र मोदी,
दिपीका पदुकोन असो वा माधुरी दिक्षीत,
महेंद्रसिंग धोनीपासुन संदीप महेश्वरी पर्यंत,
स्वामी विवेकानंदांपासुन, विवेकबिंद्रांपर्यंत,
कोणतही, तुमच्या फेव्हरेट असलेलं कोणतंही कॅरॅक्टर तुमच्या डोळ्यासमोर आणुन बघा,
त्याच्या यशाचं उत्तर तुम्हाला त्याच्या बिलीफ सिस्टीममध्ये सापडेल.
तर मित्रांनो,
यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगण्याच्या बाबतीतही हा बिलीफ सिस्टीम आपल्याला एकतर खुप मदत करतो, किंवा आपल्या मार्गात आडवा येतो,
ज्याचा बिलीफ खुप सशक्त आहे, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात चमत्कार घडवु शकते.
असे कित्येक अविश्वसनीय चमत्कार मी माझ्या आयुष्यात कित्येकदा अनुभवले आहेत,
आणि रोज कित्येक जणांसोबत ते घडतानाही पाहतो आहे,
तुमचा बिलीफ सिस्टीम कसा आहे? तो तुम्हाला साथ देतो की नाही?
का त्याच्या मागे तुम्ही फरफटत जात आहात?
लॉ ऑफ अट्रेक्शन, व्हिज्वलायजेशन, स्वसंमोहन, अफर्मेशन अशा अनेक पद्धती माणसाचा बिलीफ सिस्टीम बदलवण्यासाठी उपयुक्त आहेत.
बिलीफ सिस्टीम ला मजबुत करण्यासाठी, आपल्या स्वप्नांच्या पंखांना अतुट विश्वासाचं बळ देण्यासाठी, शुभेच्छा!

पंकज कोटलवार

Saturday, 3 August 2019

ती.तो..आणि व्हर्जिनीटी...


आज खूप दिवसांनी मला माझ्या काॅलेजचा मित्र भेटला. काॅलेजनंतर तब्बल २ ते ३ वर्षानी आम्ही एकमेकांना भेटलो. अचानक घड़लेल्या भेटीत अनेक विषयांवर आमचं चर्चासत्र आणि हास्याविनोद चालू असतानाच मी त्याला काॅलेजपासून सुरू असलेल्या त्याच्या लव्ह स्टोरीबदल विचारलं, त्यावर तो काहीच न बोलता फक्त शांत बसला. त्याच्या या शांततेने माझ्या ड़ोक्यात एकामागून एक प्रश्नाचा घड़ीमार सुरू झाला. एकमेकांशिवाय एक मिनीट ही न राहू शकणारे हे रोमियो - जूलिएट अचानक वेगळे कसे झाले? का झाले असतील आणि कशामुळे? इंग्रजीच्या व्याकरणातील 'Wh' टाईप प्रश्नांची रांग माझ्या ड़ोळयासमोर उभी राहिली. स्वतःच तयार केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतानाच त्याने उत्तर दिले "आमचा ब्रेक-अप झाला आमचं लग्न मोड़लं"... मला पुढे काही बोलण्याआधीच त्यांने सांगितल "शी इज् नॉट वर्जिन..."
तिने लग्न करण्याआधीच त्याला प्रामाणिकपणे आपल्या व्हर्जिनीटीबद्दल सांगितल्याने त्याने लग्नास नकार दिला. ३-४ वर्ष एकत्र घालवल्यानंतर आपली प्रियसी वर्जिन नाही म्हणून त्याने चक्क ठरलेलं लग्नच मोड़लं, ही गोष्ट ऐकतानाच किती विचित्र वाटते ना!
व्हर्जिनीटी म्हणजे पवित्रता, आणि हा नालायक माणुस व्हर्जिनीटी ह्या शब्दाला फक्त शारीरिक संबंधाशी जोड़तो. परंतु माणसाची पवित्रता त्याच्या आचार, विचार आणि वागणुक ह्यांच्याशी निगड़ीत असते, ह्याचा आपण कधीच विचार करत नाही. आणि ह्याच अपवित्र विचारांच्या भागीदार काही महिलासुध्दा असतात, ही सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे.

जग बदललं, विज्ञानाची प्रगती झाली आणि ह्याच विज्ञानाच्या वापराने हे जग गुगलच्या मदतीने स्त्रियांची व्हर्जिनीटी कशी चेक करायची याचा शोध घेऊ लागला. 'लड़की की सील टूटी है या नही कैसे पता करे?'

'आपकी पत्नी वर्जिन है या नही और उसकी सील कैसे चेक करे?'

अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे गुगलच्या साहाय्याने ही पुरूष प्रधान संस्कृति शोधू लागली.
सुरूवातीच्या काळापासून स्त्रीयांना आपण वर्जिन आहोत की नाही हे सिद्ध करण्यासाठी अनेक गोष्टी सामोरे जावे लागत असे,त्यातच लग्नाच्या पहिल्या रात्री बेड़वर पड़लेल्या रक्ताच्या ड़ागावरून हा समाज स्त्रीची व्हर्जिनीटी चेक करत असे. जर बेड़वर रक्त पड़लेच नाही तर ती स्त्री वर्जिन नाही असे समजले जायचे. ह्या समाजाला आपली भूक आणि गरज भागवण्यासाठी स्त्रीच लागते, पण लग्न करताना मात्र तिच स्त्री वर्जिन आहे की नाही याकड़े सर्वात जास्त लक्ष दिलं जातं. आपण विज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शक्य केल्या पण लोकांची विचार करण्याची पध्दत मात्र हा विज्ञान नाही बदलू शकला.
आज आपण २१व्या शतकात राहत असलो तरी ही अनेकांना व्हर्जिनीटी बद्दल फार काही माहिती नाही. पुर्वीपासुन चालत आलेली व्हर्जिनीटीची व्याख्या आजही अनेक ठिकाणी तिच समजली जाते.

मग व्हर्जिनीटी म्हणजे नक्की काय?

स्त्रीयांच्या योनीमध्ये एक पातळ पड़दा असतो. मेड़ीकल भाषेत योनीला व्हजायना आणि पड़दयाला हायमन म्हणतात. तो पड़दा जेव्हा फाटतो(हायमन स्पिल्ट होतो) तेव्हा स्त्री आपली व्हर्जिनीटी गमावते. हायमन स्पिल्ट फक्त शारीरिक संबंधानेच होतं अस नाही. योगा- जिम, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग, आणि जिम्नाॅस्टिक अशा अनेक कारणांमुळे हायमन स्पिल्ट होऊ शकते.
पण आपला हा समाज स्त्री आपली व्हर्जिनीटी फक्त आणि फक्त शारीरिक संबंधामुळेच गमावते असे ठामपणे आजही समजतो. आपल्या ह्या देशात आजही लग्नाच्या पहिल्या रात्री किंवा लग्नानंतर शारीरिक संबंध झाल्यावर ती स्त्री वर्जिन नाही अस समझल्यावर कितीतरी मुलांनी आपल्या बायकोला सोड़ून दिलय अस आपण आज ही ऐकतो, ही गोष्ट ग्रामीण भागातच होते अस नाही तर शहरी आणि त्यातच उच्च शिक्षीत मुलांकड़ून मोठ्या प्रमाणात होते.
.
अजुन किती दिवस आपण स्त्रीयांच्या व्हर्जिनीटीचा शोध घेणार आहोत. भविष्यात जर स्त्रीयांनीच गुगलच्या मदतीने पुरूषांच्या व्हर्जिनीटीचा शोध घेण्यास सुरूवात केली तर, पुरूषांचा पुरूषार्थ हे सहन करू शकतो का? ड़ाॅक्टरच्या माहिती नुसार पुरूषांची व्हर्जिनीटी समजणे अवघड़ असते, किंवा ते कळत नाही. जर स्त्रीला आपला पती वर्जिन आहे की नाही असे जाणून घेण्याची इच्छा नसते, मग हा पुरूष समाज कधी ह्या बुरसटलेल्या विचारातून बाहेर पड़णार आहे. रक्ताच्या ड़ागावरून स्त्रीच चारित्र्य ठरवणारया ह्या पुरूष समाजाची मागासलेली मानसिकता कधी बदलणार आहे की नाही?
आजच्या वैज्ञानिक युगात स्त्री- पुरुष समानता किंवा स्त्री ही पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे, असे आपण अनेकवेळा ऐकतो- बघतो. मग लग्न करताना स्त्रीला व्हर्जिनीटी ह्या एका गोष्टीवरून अजूनही दुय्यम स्थान का दिले जाते. व्हर्जिनीटी ह्या गोष्टी विचार करताना स्त्री आत्मनिर्भर नाही होऊ शकत का? पुरूषी अहंकार आणि मानसिकता ह्यात आपण कधी विकसित होणार आहोत की फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान यातच आपण प्रगती करणार आहोत.
मी लिहलेला हा लेख काहींना आवड़ेल किंवा आवड़णार ही नाही. कहींच्या मते हा निव्वळ टाईमपास असेल किंवा काहींना मी फक्त मुलींच्या बाजूने विचार करून लिहिलय असही वाटेल. पण आयुष्याचा जोड़ीदार निवड़ताना व्हर्जिनीटी ह्या गोष्टीला आपण किती महत्व दयावं ह्यावर विचार करणं खरच गरजेचं आहे.
.
- (सोनाली केदू भवर)